डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली स्टेशनबाहेर प्रवाशांची होणारी गर्दी आणि वाहतूककोंडी कमी करण्यासाठी डोंबिवली वाहतूक उपविभागाकडून पाऊले उचलली आहेत. डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्टेशन गेट समोर नेहमी होणारी रिक्षचालकांची गर्दी कमी करण्यासाठी व रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या उद्देशाने स्टेशनकडे प्रवासी घेवून येणाऱ्या रिक्षाचालकांनी प्रवाशांना रेल्वे स्टेशन मुख्य गेटपासून ठराविक अंतरावरच प्रवासी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्टेशन परिसरात एकाच ठिकाणी होणारी रिक्षाचालक, प्रवाशांची गर्दी कमी होईल व वाहतूकोंडी होणार नाही या उद्देशाने डोंबिवली वाहतूक शाखेकडून सर्वच मुख्य रस्त्यांवर 'परतीचे प्रवासी उतरविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल' या आशयाचे फलक लावण्यात आले. याबाबत रिक्षाचालक व प्रवासी यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली असल्याचे डोंबिवली वाहतूक उपविभाग पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.
स्टेशन परिसर वाहतूककोंडी मुक्त राहण्यासाठी डोंबिवली वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षाचालक व प्रवासी यांना आवाहन करण्यात येत आहे की, रिक्षाचालकांनी परतीचे प्रवासी हे वाहतूक शाखेकडून नेमून दिलेल्या ठिकाणीच उतरावेत तसेच प्रवाशांनी सुद्धा रिक्षा चालकाकडे कुठलाही गैरवाजवी आग्रह न करता परतीचे प्रवासी उतरण्याच्या ठिकाणीच उतरून सर्व रिक्षा चालकांना व वाहतूक शाखेला सहकार्य करावे.