प्रतिकुटुंब एक लाख रुपये असा लाभ मिळणार
मुंबई : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत इर्शाळवाडी, जि. रायगड येथील नैसर्गिक आपत्तीबाधित आदिवासी कुटुंबांना ४१ लाखांची मदत दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविण्यासाठी करण्यात आली आहे. याबाबतचा निधी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण यांना वितरित करण्यात आला असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
या दुर्घटनेत ४१ कुटुंब हयात असून केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत या आदिवासी कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या वस्तू, किराणा सामान, कपडे व इतर साहित्य पुरविण्यासाठी 50 हजार प्रति कुटुंबऐवजी विशेष बाब म्हणून प्रतिकुटुंब एक लाख रुपये, असा लाभ देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रकही विभागाने आज काढले असल्याची माहिती, मंत्री डॉ. गावित यांनी दिली.
याआधी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.