कर्जत: प्रसिद्ध भारतीय कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले. ते ५८ वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई आढळून आले.
दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि इतर अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले होत. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती.
देसाई हे प्रसिद्ध भारतीय कला दिग्दर्शक होते. त्यांना कला दिग्दर्शनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे ५२ एकर (२१ हेक्टर) मध्य एनडी स्टुडिओ उभारला होता. जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल आणि कलर्सचा रिअॅलिटी शो, बिग बॉस यासारखे शो देखील होस्ट केले आहेत.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितीन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. '१९४२ अ लव्ह स्टोरी' या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' यासारख्या सिनेमांचं कला दिग्दर्शन त्यांनी केले होते.
९ ऑगस्ट रोजी देसाई यांचा वाढदिवस असतो. ९ऑगस्ट रोजी नितीन देसाई हे वयाचे ५८ वर्ष पूर्ण करणार होते.