दिवा भाजप अध्यक्ष बदलणार हे दिव्यातील शिंदे गटाला दोन महिन्यांपासून माहिती

 

भाजपचे रोहिदास मुंडे यांचा खळबळजनक दावा

दिवा, (आरती मुळीक परब) : पदाधिकारी नियुक्त करणे ही बीजेपी पक्षांतर्गत बाब असून माझं मंडळ अध्यक्ष पद जाणार हे शिंदे गटातील दिव्याच्या नेत्यांना दोन महिन्यापासून माहीत होतं. माझं पद जाऊन सचिन भोईर अध्यक्ष होणार हे शिंदे गटाला आधीच माहीत होतं असा खळबळजनक खुलासा रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

दिव्यात शिंदे गटाचे नेते रमाकांत मढवी यांच्या कार्यपद्धतीवर वारंवार टीका करत त्यांचा गैरकारभार उघडकीस आणल्यानेच आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केले गेले का? असा प्रश्न दिव्यातील नागरिकांना पडला आहे. मात्र दिवा भाजपचा मंडळ अध्यक्ष बदलला जाणार आणि त्या ठिकाणी सचिन भोईर यांची नियुक्ती होणार हे दोन महिन्यापासूनच दिव्यातील शिवसेनेच्या नेत्यांना माहीत होतं. तशी चर्चा लोकांमध्ये होत होती. दिव्यातील भाजप पक्षात काय चालले आहे हे शिंदे गटाला आधीच माहीत होतं असा खळबळ जनक दावा भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केला आहे. जिल्हा अध्यक्ष बदलल्या नंतर मंडळ अध्यक्ष बदलत असतात. पण कोणाला काढणार आणि कोणाला अध्यक्ष करणार हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना कळत नसतं. पण दिव्यात सर्व काही आधीच ठरले होते हे शिंदे गटाच्या भूमिकेवरून दिसते, असे मुंडे यांनी म्हटले आहे. शिंदे गटाच्या दबावाखाली भाजपची पक्ष संघटना दिव्यात चालणार असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिव्यात काम कसं करायचं? असा सवाल रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे. आधीच शिंदे गटाने भाजपचे दोन मंडळ अध्यक्ष पळवले होते. ते दोन्हीही माजी मंडळ अध्यक्ष शिवसेनेत गेल्यानंतर भाजप खिळखिळी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत होते.

 अशात भाजपचा किल्ला लढवत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागील पाच वर्षांपासून भाजपचा दिव्यात विरोधक असणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांच्या गैरकारभाराचे वाभाडे भाजपच्या माध्यमातून रोहिदास मुंडे काढत होता. पाणी प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, डम्पिंग ग्राउंड, अनधिकृत बांधकामे या विषयावर आंदोलने भाजपच्या माध्यमातून होत असल्याने मनमानी करणाऱ्या शिंदे गटाला अडचण होत होती. यातूनच दोन महिन्यापासून दिवा भाजपचा मंडळ अध्यक्ष बदलणार आणि सचिन भोईर यांना मंडळ अध्यक्ष करणार अशी उघड चर्चा दिवा शिवसेनेचे नेते करत होते. दिवा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितल्या प्रमाणेच घडल्याने त्यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि ही बाब धक्कादायक असल्याचे भाजपचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post