शेतकऱ्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

 


रायगड : छत्रपती शंभूराजांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा येत्या मंगळवारी १६ जानेवारीला राजधानी किल्ले रायगड होणार असून, तो शेतकर्‍़यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

गेली नऊ वर्षे शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने रायगडावर विविध संकल्पनांच्या माध्यमातून शिवशंभू राजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले असून, कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न होणार आहे.

जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सुखी व्हावा म्हणून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतीविषयी धोरण अवलंबून दुष्काळी परिस्थितीत रयतेला आधार दिला. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, मुलुखगीरी करत असता आपणास जो जिन्नस लागेल तो त्याचा योग्य मोबदला देऊनच घ्यावा हाच शिरस्ता छत्रपती संभाजीमहाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती थोरले शाहू  महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांनी घेतला आणि काळानुसार बदल करत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योगदान दिले होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्याच शेतकऱ्यांच्या हस्ते या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा केला जाणार असल्याचे सोहळा समितीने सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post