भाजप महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांचे आश्वासन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा क्षेत्रीय बंधनाचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असे आश्वासन भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी दिले आहे. कैकाडी समाजावर असलेले क्षेत्रीय बंधन उठवण्यासह या समाजाला अनुसूचित जाती (एस सी) प्रवर्गाच्या सवलती देण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली होती. भारतीय जनता ओबीसी मोर्चाच्या वतीने कैकाडी समाजाचे प्रश्न समजून घेण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या प्रमूख उपस्थितीत आज एक बैठक संपन्न झाली. त्यामध्ये यादव यांनी हे आश्वासन दिले.
उपमुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी झालेल्या या बैठकीला या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री तसेच महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह माजी विदेश मंत्री मुरलीधरनजी,ओबीसी मोर्चा राष्ट्रीय महामंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी संगमलालजी गुप्ता, सरचिटणीस विजय चौधरी, ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय गाते, सरचिटणीस अशोक वनवे यांच्यासह महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरातमधील कैकाडी समाजाचे प्रमुख प्रतिनिधीही उपस्थित होते.
कैकाडी समाज हा महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी दोन प्रवर्गात मोडला जातो. विदर्भामध्ये हा समाज अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये गणला जातो. तर उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा, बातपश्चिम महाराष्ट्र, उत्तर विभाग आणि मुंबई परिसरात तो भटक्या विमुक्त जमातीमध्ये येतो. एकाच राज्यामध्ये असलेल्या या दोन भिन्न विभागणीमुळे कैकाडी समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या बैठकीत यादव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या पार्श्वभुमीवर राज्यातील कैकाडी समाजावर असणारे हे क्षेत्रीय बंधन उठवण्यात यावे आणि संपूर्ण कैकाडी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती लागू कराव्यात अशी आग्रहाची मागणी कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या बैठकीत केली आहे. या मागणीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. तसेच खूप वर्षांपासूनची क्षेत्रीय बंधनाची मागणीची दखल महाराष्ट्र भाजपा मार्फत या बैठकीत घेण्यात आली.
दरम्यान छोट्या छोट्या समाज घटकांच्या प्रश्नांबाबत भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत प्रथमच अशी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.यात ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी या बैठकीची प्रस्तावना केली. तसेच या बैठकीत अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय मेढे यांच्यासह संजय गायकवाड, रोहिदास अण्णा जाधव, धनंजय जाधव, कुंदन गायकवाड यांनीही कैकाडी समस्यांबाबत आपली मते मांडली. तर यावेळी ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप जाधव यांनी या बैठकीबद्दल आभार मानले. आणि सदर बैठकीत ओबीसी सेल चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.