KDMC Clean City Movment : आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करूया



सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये एक जनजागृतीचा उपक्रम २०१४ पासून सुरू केला आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून हे 'स्वच्छता अभियान' सर्वत्र राबविले जात आहे. या वर्षी अनंत चतुर्दशीनंतर संपूर्ण शहरातील गणेशघाट तसेच परीसरातील संपूर्ण स्वच्छता व्हावी, म्हणून कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेने आजपासून हे स्वच्छता अभियान राबविण्याचे ठरविले आहे असे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या अभियानाबाबत महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी त्याचप्रमाणे स्वच्छता दूत यांना धन्यवाद दिले. यावेळी मंत्री  रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ इतर अधिकारी वर्ग तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्यमार्फत कुंभारखानपाडा गणेशघाट परिसरात साफसफाई मोहिम राबविण्यात आली आणि स्वच्छता अभियानतंर्गत "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांत देशी प्रजातीच्या झाडाची लागवड मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.




स्वच्छ भारत मिशन या उपक्रमामध्ये हिरीहिरीने सहभाग घेऊन आपले शहर , आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही, आम्ही सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करूया असे प्रतिपादन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात स्वच्छता पंधरवडा १८ नोव्हेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ डोंबिवली(प.) येथील कुंभारखाण पाडा येथील खाडी परिसरात करण्यात आला त्यावेळी बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले, या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड , माजी पनगरसेवक  विकास म्हात्रे,घनकचरा व्यवस्थापण  उपायुक्त अतुल पाटील, विजयकुमार द्वासे तसेच इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग,एनएसएसचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांच्या वतीने स्वच्छतेची शपथ घेण्यात येवून स्वच्छतेबाबत पथनाट्याचे सादरीकरणही करण्यात आले.


   कल्याण मधील या अभियानाचा प्रारंभ  कल्याण (पश्चिम) येथील दुर्गाडी गणेश घाट येथे महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत  स्वच्छतेची शपथ घेवून झाला. "या स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने आपण सर्व गणेश घाटांवर साफसफाईची मोहिम सुरु केली आहे, स्वच्छतेबाबत लोकांमध्ये अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छता ही सेवा या उपक्रमात, या पंधरवडयात महापालिकेने अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे, आज उपस्थित असलेल्या एनएसएसच्या, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यामार्फतच स्वच्छतेची चळवळ घराघरात पोहोचवायची आहे ,यामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा" असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी यावेळी केले. दोन्ही ठिकाणी कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले. यासमयी महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँम्बेसिडर डॉ.प्रशांत पाटील, महापालिकेचे अति.आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त डॉ.विजयकुमार द्वासे तसेच इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होता.




Post a Comment

Previous Post Next Post