KDMC Corporation: श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी गणेश घाटावर पर्यायी रस्त्याची निर्मिती

Maharashtra WebNews
0

 


महापालिकेने अवघ्या २५ दिवसात तयार केला पर्यायी रस्ता

कल्याण, (शंकर जाधव) : कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दुर्गाडी येथील गणेश घाटावर घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. यासाठी दुर्गामाता चौकातून गणेश घाटाकडे जाणारे दोन रस्ते होते. एक मार्ग प्रवेशासाठी आणि दुसरा मार्ग बाहेर येण्यासाठी वापरला जात होता. तथापि, चालू वर्षी नेव्हल म्युझियमच्या बांधकामामुळे या मार्गांपैकी एक मार्ग कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाची गरज निर्माण झाली होती.

नागरिकांची अडचण पाहता महापालिकेने पर्यायी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. रिंग रोडवरील सीएनजी पेट्रोल पंपापासून दुर्गाडी गणेश घाटाकडे नवीन रस्ता तयार करण्यात आला.  हा रस्ता ११५.०० मीटर लांबीचा आणि १५.०० मीटर रुंद आहे. २.७० मीटर उताराच्या भागात रिटेनींग वॉल बनवून त्यावर मातीचा भराव करण्यात आला आहे. पावसाळ्यात नाल्याच्या पुलाचे काम चालू ठेवण्यात आले. नाल्यावर सहा फूट व्यासाचे चार पाईप टाकून पूल बांधण्यात आला आहे. रस्त्याचे काम पेव्हर ब्लॉक वापरून पूर्ण करण्यात आले आहे. 


सर्व कामांसाठी महापालिकेने २ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.  महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली असून श्री गणेशोत्सवाच्या आधी हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, दिवसरात्र काम करून हा नवीन रस्ता २५ दिवसांच्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे.


तथापि, रस्त्याचे कॉंक्रीटीकरण सुमारे २० ते २५ मीटरचे कॉंक्रीटचे काम अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पूर्ण केले जाईल. या दरम्यान कामकाजाची गुणवत्ता आणि जलदगती यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच घाटाच्या आसपासच्या क्षेत्रात आवश्यक सुविधा, जसे की पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थापन, आणि सुरक्षेच्या उपाययोजना सुनिश्चित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली.


श्री गणेशोत्सव हा कल्याण - डोंबिवली क्षेत्रातील प्रमुख आणि आनंददायी सण आहे, ज्यात भक्तगण मोठ्या उत्साहाने श्री गणेश मूर्तींचे पूजन करतात आणि विसर्जनाच्या दिवशी मोठ्या जल्लोषात मूर्ती गणेश घाट येथील खाडीत विसर्जित करतात. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आणि वाहतूककोंडी होण्याची शक्यता असते, त्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना अडचणी येतात. महापालिकेने घेतलेल्या उपाययोजनांमुळे या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल आणि गणेशोत्सव अधिक सुव्यवस्थित आणि आनंददायी होईल.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)