तिरुपती : तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी सापडल्यानंतर याप्रकरणी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी ११ दिवस उपवास करणार असल्याची घोषणा पवन कल्याण यांन केली. यासाठी ते २२ सप्टेंबरपासून गुंटूर जिल्ह्यातील नंबूर येथील श्री दशावतार व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात ११ दिवसांची 'प्रायश्चित दीक्षा' घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवन यांनी स्पष्ट केले.
पवन कल्याण यांनी सोशल मीडिया एक्सवर आपली भावना व्यक्त करत याबाबत मी अत्यंत दु:खी आहे आणि खरे सांगू, मला आतून विश्वासघात झाला आहे. मी भगवान व्यंकटेश्वराला प्रार्थना करतो की, तुमच्या अकारण कृपेने आम्हाला आणि सर्व सनातन्यांना या दुःखाच्या क्षणी शक्ती द्यावी अशी पोस्ट केली आहे
पवन कल्याण यांनी पुढे लिहिले की, सध्या याच क्षणी मी देवाकडे क्षमा मागत आहे, मी माझे तपश्चर्येचे व्रत पूर्ण करत आहे आणि मी अकरा दिवसांच्या उपवासाचा धार्मिक संकल्प घेत आहे. अकरा दिवसांच्या प्रायश्चित्त दीक्षेच्या शेवटी, १ आणि २ ऑक्टोबरला, मी तिरुपतीला जाईन, परमेश्वराला प्रत्यक्ष भेटेन, क्षमा मागेन आणि मग माझी प्रायश्चित्त दीक्षा परमेश्वरासमोर पूर्ण होईल. तत्पूर्वी, या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना पवन कल्याण यांनी ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची गरज व्यक्त केली होती.
याआधी पवन कल्याण यांनी ट्विट करत जगन रेड्डी यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. कल्याण यांनी ट्विट केले होते की, "मागील सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस चरबी) मिसळले गेले होते हे जाणून आम्हा सर्वांना खूप दुःख झाले आहे. तत्कालीन वायसीपी सरकारने स्थापन केलेल्या टीटीडी बोर्डाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील! या संदर्भात, आमचे सरकार शक्य ती सर्व कठोर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे. परंतु, हा संपूर्ण प्रसंग मंदिरांची विटंबना, जमिनीशी संबंधित समस्या आणि इतर धार्मिक प्रथांशी संबंधित अनेक मुद्दे उपस्थित करत असल्याचे त्यांनी म्हटले.
अलीकडेच एका प्रयोगशाळेच्या अहवालाचा हवाला देत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन रेड्डी सरकारवर प्रसादाची विटंबना केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, लॅब चाचणीत तिरुपती मंदिराचा लाडू प्रसादम तयार करण्यात येत असलेल्या तुपाच्या नमुन्यात प्राण्यांची चरबी असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते.
गुंटूरचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले, "प्रसाद वाटप १०० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. परंतु YSRCPच्या काळात राजकीय फायद्यासाठी TTD बोर्डात बदल करण्यात आले. त्यानंतर श्री व्यंकटेश्वर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये अनेक घोटाळे झाले होते आणि वायएसआरसीपीच्या राजवटीत पूजेचे प्रोटोकॉल बदलले होते आणि अधिकाऱ्यांना वायएसआरसीपीच्या काळात दूषित लाडू अयोध्येला पाठवण्यात आले होते.
पवन कल्याण पुढे म्हणाले की, वायएसआरसीपीच्या राजवटीत २१९ मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. या मंदिरांमधील तोडफोडीवर मी प्रश्न उपस्थित केला आहे. हे आम्ही खपवून घेणार नसून कठोर कारवाई केली जाईल. टीटीडी बोर्डाने गेल्या पाच वर्षांत काय केले? हिंदू भक्तांना सांगितले पाहिजे. पूर्वी जे पवित्र होते ते अपवित्र झाले आहे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.
या संपूर्ण प्रकरणावर विधानसभेत चर्चा व्हायला हवी. मी मुख्यमंत्र्यांना चौकशीची विनंती करतो. एवढेच नाही तर टीटीडीच्या कारवाईबाबत श्वेतपत्रिका अहवाल जारी करावा. आम्ही सर्व मंदिरांमध्ये प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे याची खात्री केली पाहिजे. जात आणि राजकारणाच्या पलीकडे एकतेची वेळ आली आहे.