नवी दिल्ली, : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवारी गोव्यातील ‘डे ॲट सी’ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. आयएनएस विक्रांतवरील 'डे ॲट सी' दरम्यान, त्यांच्या उपस्थितीत मिग २९K उड्डाण आणि उतरवणे , युद्धनौकेतून क्षेपणास्त्र गोळीबार आणि पाणबुडी मोहीमसह अनेक नौदल मोहिमा पार पडल्या. यावेळी त्यांना भारतीय नौदलाची भूमिका आणि कायदा तसेच मोहिमांच्या संकल्पनेबद्दल माहिती देण्यात आली.आयएनएस विक्रांतच्या खलाशांशीही त्यांनी संवाद साधला.
यावेळी आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताचा अनेक हजार वर्षांचा समृद्ध सागरी इतिहास आहे. त्याला अनुकूल सागरी भौगोलिक स्थिती देखील लाभली आहे. ७५०० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीसह, भारताचा सागरी भौगोलिक स्थिती आर्थिक विकास , प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि धोरणात्मक प्रभावासाठी अनेक संधी उपलब्ध करते. आपल्याकडे प्रचंड सागरी क्षमता आहे ज्याचा आपण विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासात उपयोग करून घ्यायला हवा.
राष्ट्रपती म्हणाल्या की, जागतिक भू-राजकीय आणि सुरक्षितता वातावरणात, विशेषत: सागरी क्षेत्रामध्ये चालू असलेल्या उलथापालथीमुळे आपण या प्रदेशात आणि त्यापलीकडे आपल्या राष्ट्रीय सागरी हितांचे रक्षण आणि पाठपुरावा करण्यासाठी आपले नौदलाचे सामर्थ्य अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. भारतीय नौदलाची सज्जता आणि दृढ वचनबद्धतेमुळेच भारताने हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण सुनिश्चित केले आहे. आयएनएस विक्रांतची तैनाती आणि परिचालन , भारताची अणुशक्तीवर चालणारी दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आयएनएस अरिघाटचे जलावतरण आणि प्रगत आघाडीच्या युद्धनौका आणि अत्याधुनिक नौदल पायाभूत सुविधांची जोड यामुळे भारताच्या सागरी सामर्थ्याला मोठी चालना मिळाली आहे. या कामगिरीमुळे भारताकडे एक मजबूत प्रादेशिक शक्ती म्हणून पाहिले जात आहे असे त्यांनी नमूद केले.


