दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
उबाठा गटाचे शहरप्रमुख सचिन पाटील यांची मागणी
दिवा, (आरती परब) : दिवा शहरातील अनधिकृत शाळा या अनधिकृत इमारतीमध्ये सुरू आहेत. ठा.म.पा व महाराष्ट्र शासन आदी कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवानगी न घेता खुलेआम मोठ्या प्रमाणात या शाळा सुरू आहेत. या शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावर पालक प्रश्न विचारत असल्याने उबाठा गटाचे शहर प्रमुख सचिन पाटील यांनी आक्रमक होत या अनधिकृत शाळा बंदच झाल्या पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे.
दिव्यातील या सर्व अनधिकृत शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा कितपत चांगला आहे, हे सांगता येत नाही. कारण शासनाच्या कोणत्याही प्रकारचा अंकुश इथे नाही. तसेच दिवा शहरातल्या बऱ्याचशा शाळेत असलेल्या महिला व पुरुष सुरक्षा रक्षक यांची चारित्र्य पडताळणी झालेली नाही, स्वच्छतागृह पुरेसे नाहीत, सीसीटीव्ही कॅमेरे चालू स्थितीत आहेत की नाही आदी कोणत्याही गोष्टीची पूर्तता न करता व कोणाचेही भय नसल्यासारखे खुले आम या शाळा सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी दिवा शहरातील स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल मध्ये मुलीच्या छेडछाडीचा घडलेला निंदनीय प्रकार पुन्हा दिवा शहरात होऊ नये व अनधिकृत शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा चांगल्या नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नुकसान होऊ नये. म्हणून दिवा शहरातील अनधिकृत शाळा कायमस्वरूपी बंद करून त्यांच्या संस्थाचालकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावं, अशी आक्रमक मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुख सचिन पाटील यांनी केली आहे. प्रशासनाने येणाऱ्या काही दिवसात अनधिकृत शाळा व त्यांच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.