रायगड, ( धनंजय कवठेकर ) : रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने वाशी, ता. पेण येथे आयोजित प्रौढ गट पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील कबड्डीपटूंना आपली कौशल्ये सिध्द करण्याची उत्तम संधी प्राप्त होणार असल्याचे मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी आ. रविशेठ पाटील, आस्वाद पाटील (सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन), वैकुंठ पाटील, चित्रा पाटील, जे.जे. पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ असून, या क्रीडासंस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी शुभेच्छा देखील दिल्या.