शेतकऱ्यांचे एमआयडीसी विरोधातील आंदोलन अखेर १२ व्या दिवशी स्थगित

 


 एमआयडीसीने शेतकऱ्यांना दिले लेखी आश्वासन


अंबरनाथ \ अशोक नाईक : अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीच्या अतिरिक्त झोन टप्पा क्षेत्र २ करिता मौजे काकोळे आणि पालेगाव येथील जागेचे केलेले भूसंपादन रद्द करावे, या मागणीसाठी शेताच्या बांधावर बसून सुरू असलेले शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण अखेर १२ व्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान एमआयडीसीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.धनंजय सावळकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्या बाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानुसार शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार अमित पुरी यांनी उपोषणस्थळी जाऊन आश्वासनाचे पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर १२ व्या दिवशी शेतकऱ्यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे.


एमआयडीसीने अति.अंबरनाथ औद्योगिक टप्पा क्षेत्र २ करीता मौजे काकोळे आणि पालेगाव येथील जमिनींचे केलेले भूसंपादन रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी बाळाराम सांबारे, फुलाजी सांबारे, गावकरी नरेश गायकर यांनी सांबारे कुटुंबासह १७ मार्च पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. एमआयडीसी प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनींचे भूसंपादन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या विरोधात सांबारे कुटुंबीयांनी पालेगाव एमआयडीसी येथील शेताच्या बांधावर आमरण उपोषण सुरू केले होते. आम्हाला कोणताही मोबदला नको, आमची सुपीक जमीन आम्हाला परत द्या. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. एमआयडीसी प्रशासन आमच्या जमिनींचे भूसंपादन रद्द करत नाही,तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. 


स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि कल्याण पूर्व चे आमदार सुलभा गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत दोन्ही आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला होता. अखेर उपोषणकर्त्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवारी एमआयडीसीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि आमदार सुलभा गायकवाड तसेच उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत एमआयडीसी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्या संदर्भात अहवाल प्राप्त करून, मुख्य कार्यालयास सादर करण्यात येईल तसेच विधी विभागाचे अभिप्राय घेऊन शीघ्र गतीने कार्यवाही करण्यात येईल, असे‌ लेखी आश्वासन एमआयडीसीने दिले आहे. हे आश्वासन पत्र अंबरनाथचे‌ हसीलदार अमित पुरी यांनी शुक्रवारी  सायंकाळी उपोषणकर्त्यांना दिले असून शेतकऱ्यांनी देखील आश्वासन पत्र स्वीकारून उपोषण तूर्तास स्थगित केले आहे.यावेळी तहसीलदार अमित पुरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, गावकरी नरेश गायकर, अनिल भोईर यांच्यासह इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


एमआयडीसीचे अधिकारी आणि आमदार यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मागण्या मान्य होण्यासाठी शासन निर्णय, मंत्रिमंडळ बैठक यासाठी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी हे प्रमुख मागण्यांचा अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे लेखी आश्वासन एमआयडीसीने दिले आहे. या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही तूर्तास हे उपोषण स्थगित केल्याचे काकोळे गावचे ग्रामस्थ नरेश गायकर यांनी सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post