नवीन ५ हजार १६० मालमत्तांची भर
कराच्या उत्पन्नात ४ कोटी ९४ लाखांची वाढ
५० कोटी १३ लाखांचा मालमत्ता कर वसूल
अंबरनाथ/अशोक नाईक : अंबरनाथ नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यावर्षीच्या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पार करत ९८ टक्के कर वसुली करत ५० कोटी १३ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. यामध्ये सुमारे ५ हजार १६० नवीन मालमत्तांची भर पडली असून जवळपास मालमत्ता कराच्या उत्पन्नात ४ कोटी ९४ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा मालमत्ताकर आहे'मालमत्ताकर नियमित भरण्यासाठी आणि वसूल करण्यासाठी कर विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून यावर्षी पालखीच्या तिजोरीत ९८ टक्के मालमत्ता कर जमा केला आहे. नवनियुक्त मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याबाबत घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे यंदा करवसुलीत मोठी वाढ झाली आहे. मालमत्ता कर विभागाचे प्रमुख नरेंद्र संख्ये प्रशांत राणे आणि त्यांच्या पथकाने अथक मेहनत घेऊन ९८ टक्के कर वसुली केल्यामुळे मालमत्ता विभागात 'लक्ष्मी'दर्शन झाल्याचे बोलले जात आहे.
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात एकूण १ लाख २ हजार २५६ सदनिका तर २८ हजार २०० वाणिज्य मालमत्ता आहेत. एमआयडीसी परिसरात जवळपास १ हजार ७०४ छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. अशा एकूण १ लाख ३२ हजार १६० मालमत्तांची पालिकेत नोंद आहे. यावर्षी मागील थकबाकीसह ५२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यानुसार अखेर ३१ मार्चपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ५० कोटी १३ लाख रुपयांचा कर जमा झाला आहे. यामध्ये साडेआठ कोटी रुपयांचा कर ऑनलाइनच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे.
अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील एमआयडीसी झोन मध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. शहरात आनंदनगर, मोरिवली आणि वडोल गाव येथील एमआयडीसी परिसरातील १ हजार ७०० कंपन्यांमधून नगरपालिकेच्या तिजोरीत कराचा मोठा वाटा आहे. एकूण कराच्या उत्पन्नात ६० टक्के कराच्या उत्पन्नात साधारण ३२ कोटी रुपये कर जमा केला जात आहे. मात्र एमआयडीसी परिसरात नगरपालिका प्रशासनाकडून एमआयडीसी क्षेत्रात स्वच्छता, सफाई, दिवाबत्ती व्यवस्था, सुरक्षा यासारख्या मूलभूत सुविधांबाबत दुर्लक्ष करण्यात येत असल्याने उद्योजकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.