कामगार वर्गाच्या प्रश्नांचे उत्तर भाजप विचारधारेतच


रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाने भाजप संघटनेत गतिमानता 

मुंबई : आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यशैलीने संघटनेत गतिमानता आणल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीसारख्या भाजपाच्या बालेकिल्ल्यातून आमदार म्हणून सलग चार वेळा निवडून येणाऱ्या रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या उजव्या विचारसरणीचा झेंडा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याबरोबरच राज्यातील विविध पक्षांतील अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या अंगीकृत संस्था त्याचसोबत विविध समाज घटक यांना भाजपच्या प्रवाहात आणण्याचा झपाटा रवींद्र चव्हाण यांनी लावला आहे.


मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. सदर कार्यक्रमात बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की "कामगार वर्गाच्या प्रश्नांचे उत्तर भाजप विचारधारेतच आहे." अंत्योदयाचे दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी भाजपा परिवार सदैव कटिबद्ध आहे. यामुळे कामगार वर्गासमोर असणाऱ्या असंख्य छोट्या-मोठ्या प्रश्नांचे समाधान केवळ भाजपा विचारधारेतच आहे, हे कामगार वर्गाला भाजपकडे आकृष्ट करण्यात यशस्वी ठरत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कामगार वर्गाने मोठ्या संख्येने आपल्या भाजप परिवारात प्रवेश करत आहे. शिव वाहतूक सेना उबाठा गटाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. महेश सुधाकर पोरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय चावनेकर, रायगड जिल्हाध्यक्ष अच्युत पाटील, रायगड जिल्हा संघटक विनायक बेलोसकर, खारघर शहर अध्यक्ष मोहसिन शेख यांच्या सोबत मुंबई, नवी मुंबई, रायगड, धुळे, जळगाव, चंद्रपूर, बीड येथील शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आज विकासाचे 'कमळ' हाती घेतले आहे. तसेच इंडिगो एजाईल एअरपोर्ट प्रायव्हेट लि. मुंबई विमानतळ, बीडब्लूएफएस मुंबई विमानतळ, एयर इंडिया, स्पाईसजेट एअरलाईन अशा विविध वाहतूक कामगार संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपचा ध्वज हाती घेतला.

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष पद ही अतिशय मोलाची जबाबदारी कामगार वर्गाने अत्यंत विश्वासाने माझ्यावर सोपवली आहे, त्यांच्या या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही ! तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सर्व मागण्या पूर्णत्वास नेईन असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले आणि कामगार वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून पाठपुरावा करेन, अशी ग्वाही यावेळी त्यांनी कामगार वर्गाला दिली. तसेच नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातील भाजप-महायुती सरकार या एकविचारी सरकारच्या माध्यमातून कामगार वर्गाचे प्रश्न निश्चित पूर्णत्वास जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

भाजप महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सत्कार सोहळ्याला अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष जितेंद्र राऊत, सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस निशांत गायकवाड आणि योगेश आवळे, उपाध्यक्ष विनोद घोगळे व रेमन कोळी, खजिनदार हर्षित तस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post