पावसामुळे साथरोगांचा धोका वाढला


कोल्हापूर महापालिकेच्या साथरोग विभागाकडून बाधित क्षेत्रांचे सर्वेक्षण सुरू

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : सध्या पावसाचा जोर वाढत असल्याने शहर आणि परिसरात किटकजन्य व जलजन्य आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. परिणामी, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाने हालचाल सुरू केली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने आशा वर्कर्सच्या माध्यमातून बाधित व संभाव्य धोकादायक क्षेत्रांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत ताप, उलटी, जुलाब, अंगदुखी आदी लक्षणांची माहिती घेतली जात असून, गरज पडल्यास संबंधित नागरिकांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी संदर्भित केले जात आहे.

महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात की, "सद्यस्थितीत पावसामुळे साचलेल्या पाण्यात मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरियाचा धोका वाढला आहे. यासाठीच प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू असून, प्रतिबंधात्मक औषधफवारणी, पाण्याच्या साठ्याची तपासणी, व नागरिकांमध्ये जनजागृती हे उपक्रमही राबवले जात आहेत."

महापालिकेने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे, घरासमोर पाणी साचू न देण्याचे, झाकण नसलेली भांडी किंवा कंटेनरमधील पाणी वेळोवेळी बदलण्याचे आणि कुठल्याही आजाराची लक्षणे जाणविल्यास त्वरित नजिकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post