भाजपचे विजय भोईर यांची मागणी
दिवा \ आरती परब : दिवा पूर्व व पश्चिमेकडील मोठ्या नाल्यांच्या सफाईमध्ये हलगर्जीपणा झाला असून या नालेसफाईची चौकशी करा, अशी मागणी भाजपचे ठाणे शहर सचिव व जागा हो दिवेकरचे अध्यक्ष विजय भोईर यांनी केली आहे. नाल्यांची योग्य सफाई न झाल्याने शेजारी असणाऱ्या घरांमध्ये पाणी भरण्याची शक्यता.
दिवा शहरातील पश्चिमेकडील भाग व दिवा पूर्वेकडील भागातील मुख्य नाले अद्यापही पूर्ण क्षमतेने साफ करण्यात आलेले नाहीत. ३१ मे ची डेडलाईन जवळ आली तरी सुद्धा शहरातील नालेसफाईचा बोजवारा उडालेला आहे. मागील अनेक वर्षांपासून दिवा शहरातील नालेसफाई ही केवळ दिखाव्यासाठी करण्यात येते, असा विजय भोईर यांनी आरोप केला आहे. नालेसफाई नीट न झाल्यानेच शहरातील सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता या नाल्याची संपली असून नैसर्गिक नाले अरुंद झाले आहेत.
या नाल्यांची खोली वाढवण्याची गरज असताना देखील नालेसफाई दरम्यान मुख्य नाले नीट न साफ झाल्याने पावसाळ्यात नाल्यांशेजारील घरांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडतात. ही बाब लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनी दिवा शहरातील नालेसफाईची चौकशी लावावी, अशी मागणीच भाजपचे विजय भोईर यांनी केली आहे. जोपर्यंत दिवा शहरातील संपूर्ण नालेसफाईची चौकशी लागत नाही, तोपर्यंत इथले प्रशासन आणि ठेकेदारांना जाग येणार नाही, असेही विजय भोईर यांनी नमूद केले आहे.
दिवा शहरातील ठेकेदार व स्थानिक अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पालिका आयुक्तांनी दिव्यातील नालेसफाईचा स्वतंत्र आढावा घेऊन याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणीच विजय भोईर यांनी केली आहे.