दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर

जे. एम. एफ. शिक्षण संस्थेचा उपक्रम ; यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न.

दिवा \ आरती परब : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते, प्रथम मार्गदर्शक आपले आई वडील, त्यानंतर शिक्षक व नंतर स्वतः आपण असतो. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनांत आता पुढे काय? या प्रश्नाने काहूर माजलेले असते, अशातच विश्वसनीय आणि अनुभवी मार्गदर्शक लाभला तर मनावरचा ताण हलका होतो व मार्ग मिळतो.

अशाच एका ध्येय मार्गदर्शनाचे शिबिराचे आयोजन जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये केले गेले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव संस्थापिका डॉ प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच अभियांत्रिकीमध्ये सुवर्ण पदक विजेते प्रोफेसर डॉ. दिनेश गुप्ता, आयोजक विश्वनाथ राणे, माजी महापौर विनिता राणे, समाजसेवक मुकेश पाटील, माजी नगरसेविका संगीता पाटील तसेच इतर पदाधिकारी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.

सरस्वती पूजन करून व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. लॉक डाऊन सारख्या प्रतिकूल काळात देखील ३०० पेक्षा जास्त ऑनलाइन वेबिनार, सेमिनार घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मनस्वी मार्गदर्शन करणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी आजच्या मार्गदर्शन शिबिरामध्ये अनन्यभावे त्यांना समजून उमजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा ही इंजिनिअर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर होण्याची असते, काही वेळेस कमी गुण अभावी त्यांना पाहिजे त्या क्षेत्रात जाता येत नाही, परंतु अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्या क्षेत्राशी निगडीत आलेले असंख्य क्षेत्र आहेत आणि ती तुमच्या साठी सुवर्णसंधी ठरू शकते असे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले. अनेक मोठ्या अयशस्वी व्यक्ती यशस्वी कशा झाल्या याचे उत्तम उदाहरण देताना "यशस्वी कथा वाचू नका, त्यानी केवळ संदेश मिळतो, अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात." असे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार सांगितले. आज नावीन्यपूर्णतेने अनेक शैक्षणिक क्षेत्राचे दरवाचे उघडे आहेत, ज्या क्षेत्रात मन रमते, बुद्धीला चालना मिळते, काहीतरी करण्याची उमेद वाढते नक्कीच अशा क्षेत्राची निवड करा असा सल्लाही दिला. त्याच बरोबर उपस्थित असलेले मान्यवर प्रोफेसर डॉ. दिनेश गुप्ता यांनी देखील विद्यार्थ्यांच्या मनाचा कल ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.

जगण्याचा दर्जा हा आपल्या विचारांवर असतो, परिस्थितीवर नाही. आपल्या भाषणात नमूद केले तेव्हा विचार उज्वल ठेवूनच क्षेत्र निवडा, ह्या विचारांनीच तुम्ही परिस्थिती बदलू शकता, असेही डाॅ गुप्ता म्हणाले. दोन तास चालू असलेल्या या मार्गदर्शन शिबिरामध्ये सुमारे २५० च्यावर विद्यार्थांनी व पालकांनी हजेरी लावली होती. प्रत्येक मुलाच्या प्रश्नाचे समाधानकारक व विश्वसनीय उत्तरे सर्वच मान्यवरांकडून मिळाली. सर्व उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचाली साठी शुभेच्या देऊन फुल न फुलाची पाकळी म्हणून कौतुकास्पद भेट डाॅ. कलाम यांचे अग्निपंख पुस्तक दिले.









Post a Comment

Previous Post Next Post