‘ऑपरेशन सिंदूर’च्या वीर जवानांना अभिवादन
पाचोरा : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे अलीकडेच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला. या निंदनीय घटनेनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत अत्यंत धाडसी आणि यशस्वी कारवाई करत शत्रूंना करारी प्रत्युत्तर दिले. या अद्वितीय शौर्याच्या आणि बलिदानाच्या सन्मानार्थ पाचोरा व भडगाव येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही तिरंगा रॅली म्हणजे केवळ एक मिरवणूक नव्हे, तर देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेला महासागर होता. हातात तिरंगा, मुखात ‘भारत माता की जय’चे घोष, आणि डोळ्यांत शूर जवानांच्या शौर्याचा अभिमान अशा वातावरणात हजारो नागरिकांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. वृद्ध, तरुण, महिला, विद्यार्थी अशा सर्व स्तरांतील नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या राष्ट्रप्रेमाची झलक दाखवून दिली.
कार्यक्रमात अनेक राष्ट्रभक्त वक्त्यांनी आपल्या भाषणातून वीर जवानांच्या पराक्रमाची महती सांगितली. ‘देशासाठी जीवन अर्पण करणाऱ्या सैनिकांचा आदर करणे, हे आपले कर्तव्य आहे’, अशा भावनिक शब्दांत अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या रॅलीत स्थानिक प्रशासन, पोलीस दल, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांनीदेखील सक्रिय सहभाग घेतला. अनेक ठिकाणी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण झाले. रॅलीचे आयोजन शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरले. ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले त्या वीरांना, पाचोरा-भडगावकरांचे मनःपूर्वक नमन!