रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांना थांबा द्यावा


 केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे मागणी

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकार पातळीवर प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची दिल्लीत भेट घेऊन रावेर व वरणगाव स्थानकांवर महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे देण्याची मागणी केली.


या बैठकीदरम्यान भुसावळ रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या रावेर स्थानकावर प्रवाशांची वाढती गर्दी आणि स्थानिकांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारींचा विचार करता तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. विशेषतः शैक्षणिक, शेती, व्यापार आणि रोजगाराच्या दृष्टीने या भागातील लोकांना रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


मागणी केलेल्या गाड्यांचे तपशील

1. नवजीवन एक्स्प्रेस (गाडी क्र. 12656) – बोदवड येथे थांबा द्यावा

2. दानापूर – पुणे एक्स्प्रेस (गाडी क्र. 12150) – रावेर येथे पुणेकडे जाणाऱ्या मार्गावर थांबा

3. महानगरी एक्स्प्रेस (गाडी क्र. 22177) – रावेर येथे थांबा


रावेर येथे या गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार व कामगार वर्ग यांना प्रवासात मोठा दिलासा मिळेल. यामुळे स्थानिक अर्थचक्राला चालना मिळून सामाजिक व औद्योगिक विकासालाही हातभार लागेल, असे मत खडसे यांनी यावेळी व्यक्त केले.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांनी या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले. बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या पुढाकारामुळे रावेरसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेसेवेचा दर्जा उंचावण्याची आशा निर्माण झाली आहे.






Post a Comment

Previous Post Next Post