मीरा-भाईंदरमध्ये जुन्या व धोकादायक इमारतींबाबत निर्णयासाठी TAC समितीकडे प्रस्ताव
मीरा - भाईंदर : मीरा - भाईंदर महानगरपालिका हद्दीत अनेक जुन्या आणि धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींच्या सुरक्षिततेबाबत निर्णय घेण्यासाठी आता तांत्रिक सल्लागार समितीची (TAC – Technical Advisory Committee) मदत घेण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अशा १० इमारतींबाबत दोन स्वतंत्र बांधकाम अभियंत्यांकडून दिले गेलेले अहवाल परस्परविरोधी आल्यामुळे अंतिम निर्णय घेण्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे हे प्रकरण TAC समितीकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
ही प्रक्रिया उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठातील रीट याचिका क्र. ११३५/२०१४ च्या निर्णयाच्या अनुषंगाने राबविण्यात येत आहे. या निर्णयानुसार, जर एखाद्या जुन्या इमारतीबाबत निर्णय घेण्यात महानगरपालिकेला अडचण येत असेल, तर अशा प्रकरणात निर्णय घेण्यासाठी विशेष तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना करावी, असा निर्देश आहे.
सदर इमारतींची प्रत्यक्ष पाहणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे आणि अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पाहणीदरम्यान इमारतींची संरचना, परिसरातील संभाव्य धोके, तसेच नागरिकांची सुरक्षितता या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, TAC समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. त्यात नागरिकांचे हित, कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन निर्देश यांचा पूर्ण विचार केला जाणार आहे.