१ जुलैपासून एसटी प्रशासनात अंमलबजावणी
मुंबई : एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० किमीहून अधिक) बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष आरक्षण केल्यास त्यांना तिकीट दरात १५ टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत योजना १ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू होत असून, दिवाळी व उन्हाळी सुट्टीसारख्या गर्दीच्या कालावधीमध्ये मात्र ती लागू असणार नाही.
ही योजना केवळ पूर्ण तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी आहे; सवलतीच्या तिकिटांवर (विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, इत्यादी) ही सवलत मिळणार नाही. ही घोषणा १ जून रोजी एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली होती, आणि आता तिची अंमलबजावणी होत आहे.
या योजनेचा लाभ येत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळू शकतो. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील आगाऊ आरक्षणावर सवलतीचा लाभ घेता येईल. मात्र हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, या सवलतीचा लाभ केवळ नियमित बसेसवर मिळणार असून, जादा गाड्यांवर नाही.
मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसेससाठीही ही योजना लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे.
तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या अधिकृत किंवा MSRTC Bus Reservation मोबाईल ॲपचा वापर करावा. तसेच प्रत्यक्ष एसटी स्टँडवरील तिकीट खिडकीवरूनही आरक्षण करता येणार आहे.
.jpeg)

