राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुक्ताईनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथील कोथळी गावात संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करून स्वतः पालखीचे सारथ्य करत या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग नोंदवला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संत मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
पालखीचे सारथ्य केल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “वारकरी परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची अध्यात्मिक व सांस्कृतिक ओळख आहे. आज संत मुक्ताबाईंच्या पालखीचे सारथ्य करण्याची, पालखी वाहण्याची संधी मिळणे हे अत्यंत भाग्याचे व गौरवाचे क्षण आहेत. संत मुक्ताबाई, सर्व संत आणि विठ्ठल चरणी एकच प्रार्थना चांगला पाऊस पडू द्या, शेती बहरू द्या, शेतकरी सुखी होऊ द्या आणि राज्य समृद्ध होऊ द्या.”
पंढरपूर वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने तयारी केली असून, सोहळ्याच्या वेळापत्रक, वाहतूक, वैद्यकीय सुविधा, पालखी तळांवरील सोयी-सुविधा आणि सुरक्षेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. महिलावर्गासाठी स्वतंत्र सुविधा व त्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वारकरी संप्रदायाचे जतन व संवर्धन हे शासनाचे कर्तव्य असल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पालखी मार्गावरील ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व स्नानगृहांची व्यवस्था केली आहे. मुक्ताईनगरहून प्रस्थान करणारी संत मुक्ताबाईंची पालखी ही तापी ते चंद्रभागा अशी सर्वाधिक अंतर पार करणारी पालखी आहे. या सोहळ्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासन सज्ज असून, वारकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पालखी बोधवड-जामनेर रस्त्यावरील नवीन मंदिरात पोहोचल्यावर काही महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिकात्मक राख्या बांधल्या.