दिवा शहरात मिठी नदीचा गाळ टाकल्यास आंदोलन

 



ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचा पालिकेला इशारा

दिवा \ आरती परब  : मिठी नदीचा गाळ दिवा- मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार असल्याची माहिती वर्तमानपत्राच्या माध्यमातून समजल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन पाटील यांनी दिवा शहरात मिठी नदीचा गाळ टाकू नये, अन्यथा नागरिकांसमवेत तीव्र आंदोलन करू, असा इशारा पालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.


शिवसेने ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन राम पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, काही वृत्तपत्रांमध्ये मिठी नदीतील गाळ दिवा- मुंब्रा येथे टाकण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. दिवा शहरात यापूर्वीच कचरा आणि छुप्या अनधिकृत डंपिंगमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यात मुंबईतील मिठी नदीतील गाळ येथे टाकल्यास दिव्यातील नागरिकांचा रोष वाढेल, असे पाटील यांनी नमूद केले आहे. तसेच या गाळामुळे वाढणाऱ्या दुर्गंधीमुळे, आजाराने दिवेकर अजून हैराण होतील.


या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधून, नागरिकांच्या भावनांचा विचार करून हा गाळ दिवा येथे टाकू नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत सहाय्यक आयुक्त, दिवा विभाग समिती, ठाणे महानगरपालिका यांनाही पाठवण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post