डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये रहिवाशांच्या घरात गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी दुपार पासून मिलापनगर मधील श्री वसंत छेडा आणि इतर काही बंगलो मध्ये गढूळ, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी आले.नागरिकांनी याची माहिती एमआयडीसीला कळविली.
मिलापनगर मधील बहुतेक बंगलो मध्ये त एमआयडीसी पाईपलाईन मधून एक कनेक्शन घेण्यात आले. ते पाणी रहिवासी पिण्यासाठी आणि अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरत असतात. परंतु हे पाणी गढूळ येत असल्याने नागरिकांपुढे आता आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आधीच डेंगू, मलेरिया, टायफॉईड, कावीळ इत्यादी साथीच्या आजारामुळे नागरिक आधीच भयभीत, त्रस्त झाले आहेत. गढूळ पाणी आल्याने काही रहिवाशांनी पॅकबंद बाटलीतले पाणी विकत आणून आपली गरज भागविली.
एमआयडीसी मध्ये नवीन नाले/गटारांची आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे जोरात सुरू असून त्यामुळे खोदकाम करताना पाण्याच्या पाईपलाईन या नादुरुस्त होत असल्याने त्यावेळी त्यात बाहेरील पावसाचे आणि उघड्या गटारातील पाणी मिसळले जात असावे तसेच काही ठिकाणी पाण्याच्या भूमिगत पाईपलाईन याना काँक्रीट रस्ते, सांडपाणी वाहिन्या इत्यादी बनविताना धक्के बसुन पाईपलाईनला चिरा पडून पाण्याची गळती जमिनीत सुरू असावी. अशा अनेक कारणांमुळे गढूळ, अस्वच्छ पाणी येत असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. एमआयडीसी कडून याबद्दल काही अद्याप माहिती मिळाली नसून त्यांच्याकडून ही गंभीर बाब दुर्लक्ष केली जात आहे. त्यामुळे आता स्वतः खबरदारी म्हणुन नागरिकांनी पाणी गरम करून उकळून प्यावे अशी विनंती सर्वांना करण्यात येत आहे.