गणेशोत्सव मंडळांना मोठा आर्थिक फटका
मुंबई : राज्यातील गणेशोत्सव मंडळांना यंदा मंडप उभारणीसाठी अधिक खर्चाचा सामना करावा लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सार्वजनिक रस्त्यावर किंवा खुल्या जागांमध्ये मंडप उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या खड्ड्यांवर आता प्रति खड्डा १५ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे लहान-मोठ्या सर्वच मंडळांवर आर्थिक भार वाढणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मंडप उभारणी करताना विद्युत साहित्य, मंडपाचे खांब बसवण्यासाठी किंवा तात्पुरत्या रचना उभारण्यासाठी रस्त्यांवर किंवा फूटपाथवर काही ठिकाणी खड्डे घेतले जातात. यावर आता महापालिका प्रशासनाने शुल्क आकारण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक खड्ड्यासाठी १५ हजार रुपये आकारले जाणार असून, खड्ड्यांची संख्या वाढली तर एकूण खर्चही वाढणार आहे.
या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह राज्यभरातील हजारो मंडळांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. अनेक गणेश मंडळांनी याविरोधात आवाज उठविला असून, शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हे शुल्क मागे घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गणेशोत्सव समन्वय समित्यांनी स्थानिक प्रशासनाकडे निवेदन देत म्हटले आहे की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जपणारा सण आहे. हे मंडळे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असतात. अशा मंडळांवर आर्थिक अडथळे निर्माण करणे दुर्दैवी आहे.”
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी, वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे शुल्क लागू करण्यात येत आहे. मात्र मंडळांच्या भावना लक्षात घेता लवकरच सर्वपक्षीय चर्चा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
नवीन अटी व नियमावलीनुसार:
-
मंडप उभारणीपूर्वी खड्ड्यांची माहिती आणि नकाशा सादर करणे बंधनकारक
-
प्रति खड्डा ₹१५,००० शुल्क अनिवार्य
-
काम पूर्ण झाल्यावर खड्डा बुजवण्याची जबाबदारी मंडळावर
-
नियमभंग केल्यास दंडात्मक कारवाई होणार
