राज्यात २१ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा


मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, नागरिकांना सचेत ॲपवरून अलर्ट


मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील काही दिवसांमध्ये १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

१६ ते २० ऑगस्टदरम्यान कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहणार असून ५०-६० किमी/ताशी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


संभाव्य पर्जन्यमान

कोकण व मध्य महाराष्ट्र : घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी.

मराठवाडा : काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (४० ते ५० किमी/ताशी).




सचेत ॲपमार्फत अलर्ट

नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सचेत ॲपवरून अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


नद्यांची पाणीपातळी वाढली

रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली.

रायगडमधील कुंडलीका नदी, रत्नागिरीतील जगबुडी व कोदवली नदीने इशारा पातळी गाठली.


आपत्कालीन संपर्क क्रमांक

राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र २४x७ सुरू असून, मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी खालील क्रमांक उपलब्ध आहेत :

०२२-२२०२७९९०

०२२-२२७९४२२९

०२२-२२०२३०३९

मोबाईल: ९३२१५८७१४३






Post a Comment

Previous Post Next Post