अन्याय थांबवा, नाहीतर जनआंदोलन उभे राहील!

 


टोरंट पॉवरच्या मनमानी विरोधात धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचा इशारा 

दिवा \ आरती परब  : दिवा शहरातील सामान्य जनतेच्या खिशाला झळ पोहोचवत टोरंट पॉवर कंपनी मनमानी पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांनी आज तीव्र आवाज उठवला.



साधारण पंधरा ते वीस हजारांचा पगार मिळवणाऱ्या कुटुंबांवर घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते अशा ताणांमुळे आर्थिक ओझे आधीच आहे. त्यातच एका महिन्याचे बिल थकले तरी टोरंटचे कर्मचारी घरात राहणाऱ्या लोकांना विचारणा न करता वीज तोडतात, तसेच उध्दटपणे बोलतात, असा रहिवाशांचा आरोप आहे. पुन्हा वीज जोडण्यासाठी नागरिकांना अन्यायकारकपणे २१० रुपये जादा भरावे लागतात.


यात भर म्हणजे प्रति युनिट तब्बल दीड रुपयांची वाढ करण्यात आल्याचे समजताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. हा अन्याय तात्काळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे व सचिव अश्विनी अमोल केंद्रे यांनी दिला.


त्यांनी मागणी केली की –

तीन महिन्यांचे बिल थकले तरच वीज तोडावी.
बिल भरल्यानंतर वीजजोडणीसाठी कोणतेही शुल्क घेऊ नये.
प्रति युनिट करण्यात आलेली वाढ तात्काळ मागे घ्यावी.

१५ दिवसांत निर्णय जाहीर न केल्यास टोरंट कार्यालयासमोर जनआंदोलन उभारले जाईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी व अधिकाऱ्यांची असेल, असे सांगण्यात आले. या प्रसंगी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे सदस्य अनिल मौर्या,धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या रणरागिणी राधा तोरणे, सरला गायकर, रेणुका स्वप्नील कांबळे, अश्विनी संतोष माने, रंजना घोडेराव, लक्ष्मी खंडागळे, शीला बहिरुने, तसेच ऑल इंडिया पँथर सेना दिवा शहर अध्यक्ष प्रफुल्ल तांबे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

Post a Comment

Previous Post Next Post