जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांची भेट
पालघर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेला ‘चला कार्यालय बघूया’ हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करत आहे. प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख, शासकीय कामकाजाची प्रक्रिया आणि विभागांचे कार्यपद्धतीचे ज्ञान देणारा हा उपक्रम सध्या मोठ्या यशाने राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्वतः प्रकल्प कार्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कार्यालयातील विभागनिहाय कामकाज, नोंदी-प्रक्रिया, शासन निर्णयांची अंमलबजावणी याबाबत उत्सुकतेने प्रश्न विचारले. जिल्हाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत हा अनुभव भविष्यात अत्यंत उपयोगी ठरेल, असे सांगितले.प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र भेटीचा दिवस ठरविण्यात आला असून संबंधित दिवशी विद्यार्थी प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष कामकाज पाहतात.
या भेटीदरम्यान विद्यार्थी आणि त्यांच्या शाळांशी संबंधित अडचणी,आवश्यक सुविधा, विकासकामांची गरज याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे शाळांमधील वास्तव परिस्थिती प्रशासनाला अधिक स्पष्टपणे समजत असून तात्काळ उपाययोजनांना गती मिळत असल्याचे प्रकल्प प्रशासनाने सांगितले.
हा उपक्रम केवळ प्रकल्प कार्यालयापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन व इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांनाही भेट देण्याची संधी देण्यात आली आहे. शासनाच्या विविध यंत्रणांची रचना, जबाबदाऱ्या आणि कामकाज प्रत्यक्ष पाहिल्याने विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व्यापक होत आहे.
जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी सांगितले की,‘चला कार्यालय बघूया’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रशासनाची सखोल, वास्तवदर्शी ओळख करून देतो. त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक विकासासाठी हा अनुभव अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी, सकारात्मक आणि प्रशंसनीय उपक्रम म्हणून व्यापक पातळीवर गौरविला जात आहे.