उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ कार्यक्रमाचे अनावरण


ठाणे : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ साकेत पोलीस मैदान, ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे औपचारिक अनावरण करण्यात आले.


‘मिशन भरारी’ उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विमानप्रवासाचा अनुभव देण्यात येणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांच्या केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांमधून जिल्हास्तरावर निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी व मार्च २०२६ दरम्यान देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमानप्रवासाची संधी मिळणार आहे.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा तसेच नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळून त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.


याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post