अविनाश जाधव, राजन विचारे आणि केदार दिघे आक्रमक
ठाणे: निवडणुकीच्या रिंगणात पक्षाचा अधिकृत 'एबी फॉर्म' घेऊनही, केवळ पैशांच्या हव्यासापोटी उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. अशा उमेदवारांनी पक्षाची आणि मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप करत, मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यावेळी माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी देखील उपस्थित राहून या भूमिकेला जोरदार समर्थन दिले. काही उमेदवारांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवली, एबी फॉर्म जोडले, मात्र ऐनवेळी विरोधी शक्तींकडून मोठ्या रकमेची तडडजोड करून आपले अर्ज मागे घेतले. हा केवळ राजकीय निर्णय नसून, पैशांसाठी केलेली फसवणूक (Cheating) आणि पक्षाशी केलेला विश्वासघात आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
"पक्षाचा एबी फॉर्म म्हणजे कार्यकर्त्यांचा विश्वास असतो. जो उमेदवार पैशांसाठी तो विश्वास विकतो, त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अशा प्रवृत्तींमुळे राजकारण गढूळ होत असल्याची टीका अविनाश जाधव (मनसे) यांनी केली.
या नेत्यांनी श्रीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित उमेदवारांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

