जिल्हा प्रशासन, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पालघर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालघर शहरात पाचबत्ती चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्राभिमान, शौर्य आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेला जिल्हा प्रशासन, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या पदयात्रेला जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वेशभूषेत सजलेली सांस्कृतिक पथके ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रेत पुढे सरकत होती. एनसीसी, एनएसएस, स्काऊट-गाईड, “माय भारत” स्वयंसेवक तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत पदयात्रेला वेगळेच तेज दिले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत सुशासन, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रसेवा यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्रितपणे आयोजन यशस्वी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना ऑनलाइन प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती दिली, ज्यामुळे युवकांचा उत्साह अधिक वाढला. इतिहासाची परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारी ही पदयात्रा पालघरच्या सार्वजनिक जीवनातील संस्मरणीय कार्यक्रम ठरली.


