ॲड. रोहिदास मुंडे यांची आयुक्तांकडे मागणी
दिवा \ आरती परब :- दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अशा बांधकामांना संरक्षण देणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्या अपात्रतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ॲड. रोहिदास बामा मुंडे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिवा विभागात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही ठिकाणी बांधकामांचे स्लॅब टाकणे, अतिरिक्त मजले उभारणे आणि सदनिकांची विक्री सुरू असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख करण्यात आला असून अनधिकृत बांधकामांना कोणतेही संरक्षण देता येणार नाही तसेच दोषींवर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दिवा विभागातील सद्यस्थिती पाहता काही अधिकारी, बांधकाम व्यावसायिक व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताची शंका निर्माण होत असल्याने स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित सहाय्यक आयुक्त, बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) किंवा अन्य सक्षम यंत्रणेमार्फत करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दोषी लोकप्रतिनिधींविरुद्ध शासनास अहवाल सादर करून त्यांच्या अपात्रतेसाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करावी, अशी ठाम भूमिका ॲड. रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे. यावेळी पत्र देताना माजी नगरसेवक हिरा पाटील, ठाकरे गट दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, योगेश निकम उपस्थित होते.

