दिवा/ आरती मुळीक परब: मागील दहा वर्ष दिव्यात तीव्र पाणीटंचाई आहे. ही पाणी टंचाई कृत्रिम असून दिव्यात मनमानी कारभार करणाऱ्या माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि माजी नगरसेवक शैलेश पाटील या जोडीच्या गलथान कारभारामुळे पाण्याची समस्या लोकांना भेडसावत असल्याचा घनाघाती आरोप भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
लोकांना पिण्यासाठी असणारे पाणी माजी उपमहापौर रमाकांत मढवी हे बिल्डरांकडून स्लॅब मागे पैसे घेऊन बांधकामे करायाला देतात, परिणामी लोकांना पाणी मिळत नाही असा गंभीर आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे. दिव्यातील जनतेला मागील 10 वर्षे पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही आणि अनधिकृत बांधकामे करायला मात्र पाणी उपलब्ध होते, याचे उत्तर रमाकांत मढवी यांनी जनतेला द्यावे. शैलेश पाटील यांनी मनमानी पध्दतीने स्वतःच्या लोकांना पाणी लाईन दिल्या असल्याने दिव्यातील अन्य जनतेला पाणी मिळत नाही. रमाकांत मढवी आणि शैलेश पाटील या जोडीमुळे दिवा शहराला पाणी समस्येचा शाप लागला आहे, असा घणाघात रोहिदास मुंडे यांनी केला आहे. मागील वर्षेभरात दोन वेळा पाणी वाढविण्याच्या घोषणा झाल्या. मात्र वाढलेले पाणी कुठे मुरते याचे उत्तर आता मिळत असून मढवी हे पैसे घेऊन बिल्डरांना बांधकामे करायाला देत असल्याने नागरीकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यातच दिव्यातील दूषित पाण्यामुळे मानसी रसाळ या सहा वर्षाच्या मुलीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला, असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
रोहिदास मुंडे, दिवा शहर अध्यक्ष भाजप
Tags
महाराष्ट्र
