मणिपूर प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी
नवी दिल्ली: विरोधी पक्षांच्या आघाडीच्या २१ खासदारांसह ३१ खासदारांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी भारतीय राष्ट्रीय विकास समावेशक आघाडी (इंडिया) च्या घटक पक्षांच्या खासदारांनी मणिपूर प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे सांगून राष्ट्रपतींना विशेषत: मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार, पुनर्वसन आणि इतर परिस्थितींबद्दल माहिती देत पंतप्रधानांनी मणिपूरला भेट देऊन राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलावीत अशी प्रमुख मागणी केल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. मणिपूरला भेट दिलेल्या २१ खासदारांच्या शिष्टमंडळाने त्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली.
मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्षाचा प्रश्न लवकर सुटला नाही, तर देशासमोर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यावर शिष्टमंडळाने भर दिला. मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करावे आणि पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेस आणि विरोधी आघाडी 'इंडिया'चे इतर घटक करत असल्याचे देखील सांगितले.