डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण- डोंबिवलीतील श्री गणेशाचे-गौरींचे विसर्जन शांततामय वातावरणात उशीरापर्यंत एकूण २९५०१ विविध विसर्जन स्थळांवर करण्यात आले.यात सर्व प्रभागात मिळून ६४४४ शााडूच्या व २३०५७ पिओपीच्या मूर्ती होत्या. ५ दिवसांच्या श्रीगणेश-गौरींचे विसर्जनाच्या दिवशी सुमारे ३७.९१ मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले.यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील महापालिकेस सहकार्य केले. महापालिकेमार्फत , गणेशोत्सव मंडळांकडून निर्माल्य संकलन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निर्माल्य रर्थांमार्फत( कल्याण मध्ये २ व डोंबिवली मध्ये २ डंपर्स) ४.५ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. याकामी विविध सामाजिक संस्थाचे सहकार्य महापालिकेस लाभले.
संकलित केलेले हे निर्माल्य कल्याण येथील ऊंबर्डे मधील बायोगॅस प्रकल्पात नेवून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. तर डोंबिवलीतील निर्माल्य हे श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली यांच्या खत निर्मिती प्रकल्पासाठी देण्यात आले आहे. विसर्जन स्थळांवर धुरीकरणाची व्यवस्था देखील महापालिकेमार्फत करण्यात आली होती.विसर्जनाच्या वेळी महापालिकेमार्फत विसर्जन स्थळी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
प्रमुख विसर्जन स्थळांवर महापालिकेचे प्रभागातील सहा. आयुक्त, पोलीस कर्मचारी ,घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी ,अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्याचप्रमाणे वैद्यकीय पथक देखील उपलब्ध करून देण्यात आले होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, परिमंडळ -२ चे उपायुक्त अवधूत तावडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी रात्रीचे वेळीही विसर्जन स्थळांची/ विसर्जन व्यवस्थेची समक्ष पाहणी करून कर्मचाऱ्यांना भाविकांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने योग्य ती व्यवस्था करणे बाबत सूचना दिल्या.संकलित केलेल्या निर्माल्याची आता शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जात असल्याने नदी, खाडी यामध्ये हे निर्माल्य जावून सदर जलस्त्रोत प्रदुषित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.