नाशिक: गेल्या दोन महिन्यांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने नाशिकसह जिल्हाभरात जोरदार पुनरागमन केले आहे. गुरुवारी पहाटेपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली. ९१ टक्के भरलेल्या गंगापूर धरणातून सकाळी एक वाजेपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दुपारी १ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे १० हजार क्यूसेक पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात ८ आणि ९ सप्टेंबरला हवामान विभागाने यलो अलर्टचा इशारा दिला आहे.
राज्यात पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी पहाटेपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्यात नाशिक शहरातील पावसाची १० मिलिमीटर नोंद करण्यात आली आहे. रात्री आठ वाजल्यापासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने सध्या गंगापूर धरण समूहात ९० टक्के पाणीसाठा आहे. या हंगामात गोदावरी अजून एकदाही दुथडी भरून वाहताना नाशिककरांना बघता आलेली नाही. गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत गोदावरीला किमान तीन ते चारवेळा पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. रामसेतू पुलावरून पाणी वाहून गेले होते. आजच्या दिवशी गेल्या वर्षी तो ९७ टक्के होता. अजूनही ७ टक्के तूट भरून निघण्याची प्रतीक्षा आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाला अनुकूल वातावरण असून १५ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. त्यानंतर पुन्हा २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज असल्याच हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज असून दोन दिवस शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
.jpeg)
.jpeg)