पाणीटंचाईवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरेचा महिला मेळाव्यात हल्लाबोल
दिवा, ( आरती मुळीक परब) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करायचे असतील तर दिवा शहरातून एक एक ज्योत पेटवून ही मशाल तेवत ठेवली पाहिजे, असे सांगताना येथील खासदार व आमदारांनी दिवावासियांच्या मतांचा केवळ बाजारच केला, सुविधा मात्र येथील नागरिकांना दिल्याच नाहीत, असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी दिवा येथे आयोजित महिला मेळाव्यात केला.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी तन्वी फाउंडेशन व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील आकांक्षा हॉल येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ज्योतीताई ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. दिवा शहरातील महिलांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत असून येथे प्रसूतीगृह किंवा रुग्णालय नाही. त्याचबरोबर येथील महिलांना पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. दिवा शहरासाठी अग्निशमन केंद्र शहरात अस्तित्वात नाही. एकीकडे 221 कोटीची पाणी योजना राबवली गेली, मात्र दिव्यातील महिलांच्या घरात मुबलक पाणी मिळाले का? असा सवाल ही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. यावेळी त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे त्याचबरोबर आमदार आणि सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करत भाजपच्या केंद्रीय धोरणांवर देखील टीका केली.
वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून आता महिलांची एकजूट महत्वाची असल्याचे ज्योतीताई ठाकरे यावेळी म्हणाल्या. दिवा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी महिला मोठ्या संख्येने उभ्या असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. ज्योतीताई पाटील या महिलांमध्ये उत्तम काम करत असून महिला संघटित करण्याचे काम त्या करत असल्याचे ज्योतीताई ठाकरे यावेळी म्हणाल्या. यावेळी शिवसेना प्रवक्ते अनिश गाढवे, खासदार राजन विचारे यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांचीही भाषणे झाली.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी हजारो महिलांची उपस्थिती होती. विधानसभा दिवा शहर संघटिका योगिता नाईक, शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, उप शहर संघटक प्रवीण उतेकर, उपशहर संघटिका प्रियंका सावंत, उपशहर प्रमुख तेजस पोरजी, विभाग प्रमुख चेतन पाटील, संजय जाधव, रवी रसाळ, मचिंद्र लाड, शनिदास पाटील, हेमंत नाईक, उप विभागप्रमुख योगेश निकम, सतीश मांडरेकर, शाखा प्रमुख अनिकेत सावंत, मूर्ती मुंडे, शशिकांत कदम, स्मिता जाधव, संभाजी जाधव, रोहिदास रतन मुंडे, अनिल पवार, संजय अरदलकर, सुशील रसाळ, सुहासिनी गुळेकर, उषा साळुंके, साधना सिंग, पूनम पाटणकर, जानवी जावडेकर, नीता पाटील, श्रुती पवार, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, तन्वी फाउंडेशन सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.