मजरे कासारवाडा येथे संघर्षिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या कृषी सेवा केंद्राचे उदघाटन
बिद्री \ विनायक जितकर : राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या संघर्षिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमास प्रकल्प समन्वयक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, माजी सभापती वंदना जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, शेतीचे भविष्य आधुनिक तंत्रज्ञान आणि सशक्त व्यवस्थापनावर अवलंबून आहे. ‘संघर्षिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’चे हे कृषी सेवा केंद्र म्हणजे ग्रामीण भागात परिवर्तनाची सुरुवात आहे. महिलांनी पुढाकार घेऊन उभारलेला हा उपक्रम इतरांसाठी आदर्श ठरेल. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त बियाणे वा खते नव्हे, तर आत्मविश्वास, ज्ञान आणि दिशा मिळणार आहे. सरकारच्या वतीने अशा प्रेरणादायी प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा दिला जाईल.
यावेळी बोलताना सुषमा देसाई म्हणाल्या, महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही उत्पादक कंपनी आणि तिच्या माध्यमातून उभे राहिलेले कृषी सेवा केंद्र हे ग्रामीण सक्षमीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महिलांचे नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतलेला हा उपक्रम इतर गावांसाठी दिशादर्शक ठरेल. जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने आम्ही यासारख्या पुढाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत राहू.
या कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीसाठी आवश्यक सर्व सेवा – बी-बियाणे, खते, औषधे, जैविक व सेंद्रिय उत्पादनं, आणि तांत्रिक मार्गदर्शन – एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या उद्घाटन समारंभास परिसरातील शेतकरी, महिला बचतगट, स्थानिक नेतेमंडळी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कृषी सेवा केंद्र उभारणीसाठी दिगंबर तहसीलदार, रणजित साळोखे यांच्यासह संचालक मंडळ व सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.