वीरेंद्र सेहवागचे मोठे विधान
मुंबई : आयपीएल २०२६ मधील साखळी फेरीचे सामने संपल्यानंतर आता स्पर्धा निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. यंदाच्या हंगामात बंगळुरु, गुजरात, हैदराबाद आणि राजस्थान या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या पात्रता सामन्यात बंगळुरु आणि गुजरात हे संघ आमनेसामने येणार आहेत.
तर मुंबई, लखनौ, चेन्नई, कोलकाता, पंजाब आणि दिल्ली या संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आगामी हंगामासाठी काही संघांनी कर्णधार बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
एका चर्चेदरम्यान सेहवागने विविध संघांच्या कर्णधारांबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. त्याच्या मते रजत पाटीदार, अक्षर पटेल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, पॅट कमिन्स आणि श्रेयस अय्यर यांनी कर्णधारपदी कायम राहावे.
मात्र हार्दिक पांड्या, रियान पराग आणि अजिंक्य रहाणे यांना कर्णधारपदावरून हटवण्याची वेळ आल्याचे त्याने म्हटले आहे. ऋषभ पंतबाबत सुरुवातीला सेहवागने संभ्रम व्यक्त केला, मात्र अखेरीस त्यालाच कर्णधारपदी कायम ठेवण्यास पसंती दिली.
‘या’ तीन संघांना नव्या कर्णधाराची गरज
सेहवागच्या मते पुढील हंगामापूर्वी मुंबई, कोलकाता आणि राजस्थान या संघांनी नव्या कर्णधाराचा विचार करायला हवा. तर बंगळुरु, लखनौ, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात या संघांनी आपल्या विद्यमान कर्णधारांवर विश्वास कायम ठेवावा, असेही त्याने स्पष्ट केले.

