नदीचे पाणी नदीतच रोखण्यासाठी २८ फ्लड गेट्स बसवणार
मुंबई : २६ जुलै, २००५ मध्ये मुंबई पाण्याखाली गेल्याच्या आठवणी आजही भयावह आहेत. या दिवशी झालेल्या तुफान पावसात शेकडो मुंबईकर महाप्रलयात वाहून गेले तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रसंगानंतर मिठी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि नदी शेजारील परिसरावर संकटाची तलवार सतत लटकत राहीली आहे. या भयावह आपत्कालीन परिस्थितीनंतर दोन हजार कोटी रुपये खर्च करून मिठी नदीचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
पावसाळ्यात मिठी नदी शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी मिठी नदी शेजारी फ्लड गेट्स बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. एकूण २८ ठिकाणी फ्लड गेट्स बसवण्यात येणार असून यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. फ्लड गेट्स बसवल्यानंतर मिठी नदी शेजारीला रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिठी नदीतील सांडपाणी, रसायन मिश्रीत पाणी रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. विहार तलावापासून माहीम खाडीपर्यंत नदी विस्तारली असून, ही नदी अंधेरी, वांद्रे, कुर्ला परिसरातून जाते. त्यामुळे माहीम खाडीपासून सुरू होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रासह अन्य भागात फ्लडगेट्स बसविण्याचे नियोजन पालिकेचे आहे. या परिसरात फ्लडगेट्स उभारल्याने भरतीच्या वेळेस हे दरवाजे बंद केल्यास नदीतील पर्जन्य जलवाहिन्यांतून पाणी रोखण्यास मदत होईल. ओहोटीच्या वेळेस हे दरवाजे उघडून पर्जन्य जलवाहिन्यांमधील पाणी नदीत जाण्यास मदत होणार आहे. तसेच पाणी ओव्हरफ्लो होऊन रेल्वे रुळांवर जाणार नाही. वाहतूकही सुरळीत राहील. त्यामुळे मिठी नदीवर फ्लडगेट्स बसविण्यात येणार आहे. या फ्लडगेट्समुळे पावसाळ्यात शहरात भरणारे पाणी रोखण्यास याची मदत होणार आहे.
..