डोंबिवली ( शंकर जाधव ) :आमदार जितेंद्र आव्हाड त्यांन देवतांवर बोलण्यापेक्षा अफजल खान , औरंगजेब यांच्याबद्दल मुंब्रा येथे जाऊन प्रवचन करावे असा सल्ला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे. यासंदर्भात आव्हाड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. शुक्रवारी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे डीप क्लीन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खासदार डॉ.शिंदे बोलत होते.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अशांतता पासरवण्यामध्येच त्यांनी पी. एच. डी केली आहे. हिंदू देव देवतांवर भाष्य केल्याने मुंब्रा येथील मतदार खुश होतील असे त्यांना वाटते. त्यामुळे मुंब्रा येथे जाऊनच त्यांनी अफजल खान , औरंगजेब यांच्यावर प्रवचने द्यावीत. हिंदू देव देवता विरोधात वक्तव्य होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या डीप क्लीन मोहिमेची मुंबई येथून सुरुवात झाली. ही मोहीम राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहे. आज त्याचा कल्याण महापालिकेतर्फे शुभारंभ करण्यात आला असून बाहेरून देखील कामगार मागवण्यात आले आहेत. पारंपारिक पद्धतीने शहर स्वच्छ करण्यासोबतच आजूबाजूला जमलेली धूळ स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यामुळे मशीनने ही धूळ स्वच्छ केल्याने शहरातील कोपरे देखील स्वच्छ होणार आहेत. सर्वच महापालिका ही मोहीम राबविणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.